९. समुद्र कोंडून पडलाय | 12th Marathi Digest PDF Download

९. समुद्र कोंडून पडलाय | 12th Marathi Digest PDF Download. खाली “९. समुद्र कोंडून पडलाय” या कवितेचा एक विश्लेषणात्मक स्तराचा लेख आहे — त्यातील अर्थ, भाव, काव्यसौंदर्य व त्याचा सामाजिक संदर्भ. त्याचबरोबर, मी काही टिप्स देईन की तुम्ही या कवितेचे PDF कसे शोधू शकता — परंतुचं प्रत धोरणानुसार प्रत पूर्ण पाठ्यपुस्तक PDF वितरणाबाबत मी पुरा पाठपुरावा नहीं करेन, पण योग्य स्रोतांची माहिती देऊ शकेन.

कृती

1. अ. खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1. उंचच उंच पण अरुंद बालपण-

उत्तर :
किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो. त्याच्या मनात विचार येतो की, शहर उंचच उंच इमारतींनी नटलेय; पण त्यांत बालकांचे बालपण मात्र खुजे झालेय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे. त्यामुळे त्याचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद झालेले आहे.

प्रश्न 2. डोळ्यांत उतरलेलं थकव्याचं आभाळ-

उत्तर :
समुद्र जेव्हा उत्तुंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या एका निरागस बालकाला पाहतो, तेव्हा त्याला बालकाच्या बालपणाची खंत वाटते. त्याचे बालपण खुजे होत चाललेय, याची मनस्वी काळजी वाटते. त्रासून तो हताशपणे बालकाकडे पाहतो नि समुद्राच्या डोळ्यांत आभाळभर थकवा उतरतो.

प्रश्न 3. स्टेशनवरल्या बाकाएवढं मुलाचं बालपण-

उत्तर :
महानगरीय जीवनाची झालेली घुसमट पाहून समुद्र संत्रस्त होऊन शहरातून हिंडतो व थकून स्टेशनवरच्या बाकड्यावर बसतो. तेव्हा त्याला शेजारी एक मूल पाय पोटाशी दुमडून झोपलेले आढळते. त्याच्या मनात विचार येतो की, या शहराच्या रहदारीत या बालकाचे बालपण हरवले तर आहेच, पण ते खुंटत चालले आहे. बालपणीचा त्यांचा आनंद आक्रसला आहे. जणू त्याचे बालपण हे स्टेशनवरल्या बाकड्यापुरतेच मर्यादित व बंदिस्त झाले आहे.

आ. कारणे लिहा.

प्रश्न 1. कवीला समुद्र संत्रस्त वाटतो, कारण ………

उत्तर :
कवीला समुद्र संत्रस्त वाटतो; कारण समुद्र गगनचुंबी इमारतीच्या गजांआड कोंडून पडलाय.

प्रश्न 2. समुद्र अस्वस्थ होतो, कारण ……..

उत्तर :
समुद्र अस्वस्थ होतो; कारण तो घुसमटलेल्या शहराच्या आयुष्यांचा चिंताग्रस्त होऊन विचार करतो.

प्रश्न 3. समुद्र शिणून जातो, कारण ………

उत्तर :
समुद्र शिणून जातो; कारण त्याला शहरातल्या सगळ्यांच्या बालपणाची व वयस्कांची खूप काळजी वाटते.

2. अ. तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना मनाला भिडणारे शब्दसमूह

उत्तर :

कवितेचा विषय कवितेची मध्यवर्ती कल्पना मनाला भिडणारे शब्दसमूह
आक्रसून गेलेल्या महानगरीय जीवनाची शोकांतिका समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे. महानगरीय जीवनाची घुसमट आणि माणसांची होत असलेली नगण्य अवस्था पाहून समुद्र चिंताग्रस्त झालेला आहे. 1. समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचे आभाळ उतरते 

2. मुलाचे बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढे

 

आ. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

 

कवितेतील समुद्राने केलेल्या मानवी क्रिया

उत्तर :

(१) पिंजारलेले दाढी व झिंज्या.
(२) शहरातल्या रस्त्यावरून व वस्त्यांमध्ये हिंडतो.
(३) हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी पाहतो.
(४) समुद्र खिन्न हसतो.

3. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
समुद्र अस्वस्थ होऊन जातो
शहराच्या आयुष्याच्या विचाराने.
तेव्हा तो मनांतल्या मनांतच मुक्त होऊन फिरूं लागतो
शहरांतल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून.
उशिरापर्यंत रात्रीं तो बसलेला असतो
स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत,
हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी.

उत्तर :
ओळींचा अर्थ : माणुसकीहीन झालेल्या शहरी जीवनाचा विचार करून समुद्र बेचैन होतो. मनातल्या मनात मुक्तपणे वावरतो. शहरातल्या रस्त्यांवरून विमनस्कपणे हिंडतो, वस्त्यांमधून पायपीट करतो आणि अखेर उशिरा रात्रीपर्यंत स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर बसतो. समोरच्या गाड्यांची रहदारी निमूटपणे पाहत असतो. हातांवर डोके ठेवून हतबल होऊन अर्धमिटल्या डोळ्यांनी हा महानगरीय ह्रास पाहत राहतो.

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘त्याला आठवतं त्याच्याच शेजारीं
पाय मुडपून कसंबसं झोपलेलं एखादं मूल,
ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाकाएवढं,
आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी’
या ओळींमधील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी महानगरीय जीवनातील फोलपणा अधोरेखित करताना उपरोक्त ओळी लिहिलेल्या आहेत.

महानगरीय घुसमट व्यक्त करताना कवी समुद्राचे रूपक वापरतात. समुद्र म्हणजे अफाट जीवन! ते आजमितीला शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजांआड कोंडून पडले आहे. या विचारांनी अस्वस्थ झालेला समुद्र रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर हताश होऊन बसतो. त्या वेळी त्याच्याच शेजारी त्याच बाकड्यावर एक मूल पाय छातीशी दुमडून झोपलेले त्याला आढळते. त्याच्या भविष्याने चिंतित झालेल्या समुद्राला त्याचे खुरटलेले बालपण त्या बाकाएवढेच संकुचित असलेले जाणवते. पण झोपी गेलेल्या मुलाला या भयानक वास्तवाची कल्पना असावी की नसावी, ही शंकाही समुद्राच्या मनात डोकावते.

भविष्यकालीन पिढीचे बालपण महानगराच्या भगभगीत संस्कृती उजाड व सिमित झाले आहे, हा विचार हृदय हेलावून टाकणाऱ्या शब्दांत कवीने सशक्तपणे मांडला आहे.

प्रश्न आ.
‘समुद्र खिन्न हसतो आणि शिणलेल्या पापण्या मिटून घेतो.
त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची
वयस्कांच्या शहरांतील.’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
महानगरीय दुरवस्था नि घुसमट ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी भावपूर्ण शब्दांत चित्रित केली आहे. मूल्यहीन शहरी संस्कृतीच्या विचाराने त्रस्त झालेला समुद्र अपरात्री थेकूनभागून रेल्वे-फलाटावरील एकाकी बाकड्यावर विसावतो. तेव्हा त्याच बाकड्यावर एक मूल पोटाशी पाण्याची मोटकुळी करून झोपलेले त्याला दिसते.

बालपण असे संकुचित झालेले पाहून समुद्र विषादाने उदास होऊन हसतो. जळजळणाऱ्या डोळ्यांवर दमलेल्या पापण्या मिटून घेतो. वयस्क शहरातील साऱ्या माणसाच्या बालपणाची त्याला घोर चिंता वाटू लागते. उगवत्या पिढीचे भविष्यकालीन खुरटलेले संकेत पाहून तो मनात हळहळत राहतो.

स्टेशनवरच्या या चित्रदर्शी दृश्यातून कवीने समुद्राच्या मनातील विवंचना अचूक व भावपूर्ण शब्दांत रेखाटली आहे. भविष्यकालीन निर्मळ जीवन शहरी संस्कृती मुकणार आहे, तिचा भावनिक ऱ्हास डोळ्यांदेखत पाहतानाची वेदना कवीने मूर्त केली.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतींच्या गजांआड.
तो संत्रस्त वाटतो संध्याकाळीं : पिंजारलेली दाढी, झिंज्या.
हताशपणे पाहत असतो समोरच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाकडे,
ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय
आणि त्याची त्याला कल्पनाच नाही.
समुद्राच्या डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरत येतं
आणि शिणून तो वळवतो डोळे.
इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसचीं चाकं.
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेत कवी वसंत आबाजी डहाके यांनी ‘समुद्र’ हे अथांग जीवनाचे रूपक घेऊन महानगरी जीवनाची मूल्यहीनता आणि संवेदनशीलता प्रकर्षाने दाहक शब्दांत मांडली आहे. या संदर्भात उपरोक्त ओळीत समुद्राची असाहाय्य हतबलता अधोरेखित केली आहे.

काव्यसौंदर्य : किनाऱ्यावरील टोलेजंग, उत्तुंग इमारतीच्या गजांआड समुद्र म्हणजे पर्यायाने निर्मळ अथांग जीवन कैद झालेले आहे. संध्याकाळच्या वेळी अतिशय त्रासलेला समुद्र दाढी व झिंजा पिंजारून हताश झाला आहे. त्याला गगनचुंबी इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर एक मुलगा दिसतो. त्या मुलाचा विचार करताना समुद्राला हे जाणवते की मुलाचे बालपण निमुळते, टोकदार आणि अरुंद म्हणजे खुजे झालेले आहे, याची त्या बालकाला कल्पनाच नाही.

भौतिक प्रगतीची उंची आणि खुजी झालेली बाल्यावस्था यातील विरोधाभास समुद्राच्या लक्षात येतो. त्याच्या डोळ्यांत अफाट थकवा येतो. म्हणून तो नजर वळवून इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावरचे माणसांचे रखडत चाललेय पाय व सुसाट पळणारी बसची चाक पाहतो. तिथेही त्याला गती-अधोगतीचे विचित्र चित्र दिसते.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत कवीने मुक्तच्छंद योजिला आहे. कवीने मुक्तशैलीतील विधानात्मक मांडणी करून महानगरीय वैफल्यग्रस्तता शब्दांतून दर्शवली आहे. त्यामुळे गिरमिटाने ऊर्ध्वमूल पोखरण जावे, तशी शब्दकळा हृदयाला थेट भिडते व व्याकूळ अनुभवांची प्रचिती येते. समुद्र चलत व गतिमान क्रियापदांमुळे समुद्राचा मानसिक प्रवास दृग्गोचर होतो.

‘पिंजारलेले केस व दाढी’ या शब्दबंधातून समुद्राचे मानवीकरण करून भावनिक पातळीत कविता जाताना दिसते. ‘उंचच उंच व अरुंद बालपण’, ‘डोळ्यांत थकव्याचं आभाळ’ या प्रत्ययकारी प्रतिमांतून आशयाचा विस्तार अधिक गडद झाला आहे. महानगरीय संवेदनेची ही मराठी कविता शहरी संस्कृतीचे दर्शन सार्थपणे घडवते.

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ. ‘समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे’, अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.

उत्तर :
मी समुद्र बोलतोय. आज न राहवून मी माझ्या मनातील वेदना व्यक्त करतोय. पूर्वी ‘समुद्र अथांग आहे, असीम आहे.’ अशी वाक्ये माझ्या कानावर पडायची, तेव्हा मला अफाट आनंद होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ‘सागरा प्राण तळमळला’ अशी जेव्हा मला साद घातली, तेव्हा माझा ऊर भरून आला; कारण भारतीय स्वातंत्र्याची आस मलाही होती.

कुसुमाग्रज यांनी तर ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेत “हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे डळमळू दे तारे, कथा या खुळ्या सागराला / अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला” असे आव्हान दिले, तेव्हा माणसाच्या ध्येयासक्तीला किनारा नाही, याचा मलाही अभिमान वाटला. पण आजचे निराशाजनक चित्र पाहून मात्र जीव खचतो माझा! पूर्वी माझ्या किनाऱ्यावरून मी अफाट, मैलोनमैल पसरलेली धरती न्याहाळायचो. त्या धरणीमायची साथ मला असायची. तिच्या कुशीत जाण्यासाठी मी लाटा उसळून आतुरतेने तळमळायचो.

पण याच माझ्या किनाऱ्यावर आज मानवाने उत्तुंग, टोलेजंग, उंचच उंच इमारती उभारून धरणीमाय अदृश्य केली आहे. आजचा मानव आकाशाला गवसणी घालायला निघाला; पण जमिनीवरचे पाय विसरला. प्रचंड वेगाने भौतिक सुखे पदरात पाडून घेताना मायेचा पदर त्याला पारखा झाला. लौकिक सुखाच्या हव्यासापोटी त्याने चंगळवादी संस्कृतीला जन्म दिला. प्रगती व यश यांच्या चुकीच्या संकल्पना मनात घोळवू लागला व निसर्गाला पारखा झाला.

पंचमहाभूतांपैकी मी एक ‘भूत’ तुम्हांला सांगत आहे. तुम्ही वेळीच सावध झाला नाहीत, तर तुमच्या भविष्यातील भूत तुमच्याच मानगुटीवर बसेल नि मग प्राण दयायला माझ्याकडे याल, तेव्हा माझी माया आटलेली असेल!

प्रश्न आ. शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशाप्रकारे प्रकट झाली आहे, ते स्पष्ट करा.

उत्तर :
‘समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी शहरातील मुलांचे भयाण वास्तव भावपूर्ण शब्दांत ग्रथित केले आहे. किनाऱ्यावरील उभारलेल्या उंचचउंच गगनभेदी इमारतीच्या गजाआड समुद्र कोंडलेला आहे. तो हतबल होऊन इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावर अडकून पडलेल्या निरागस बालकाकडे हताश होऊन पाहत आहे. तो विचार करतो की या मुलाचे बालपण निमुळते टोकदार असले तरी ते अरुंद झाले आहे. त्याला जमिनीवरचे आनंददायी अंगण दिसत नाही, ही त्याच्या बाल्यावस्थेची शोकांतिका आहे.

दुसरीकडे एक, दुसरे निरागस बालक स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावर पोटाशी पाय दुमडून आक्रसून झोपले आहे. एक गगनचुंबी इमारतीत दुसरे अनिकेत जमिनीवर हा विरोधाभास वेदनामय आहे. दोघांचेही भविष्य अंधारात असल्याची जाणीव समुद्राला म्हणजेच पर्यायाने निकोप जीवनाला येणे, हे दुःखमय आहे. समुद्र या दोन्ही अवस्थांकडे हताशपणे पाहत बसतो. दाढी व झिंजा पिंजारून अस्वस्थपणे शहरातील वस्ती वस्तीमधून सैरभैर हिंडत राहतो. अशा प्रकारे शहरातील बाल्याची अवस्था कवितेतून कवींनी समर्थपणे चितारली आहे.

प्रश्न इ. ‘समुद्र कोंडून पडलाय’, या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दांत उलगडून दाखवा.

उत्तर :
समुद्र म्हणजे अमर्याद असलेले प्रवाही मानवी जीवन होय !समुद्रासारखे सर्जनशील अथांग जीवन जेव्हा महानगरांच्या मर्यादेत बंदिस्त होते, त्या वेळची बेचैन अवस्था, जीवघेणी घुसमट “समुद्र कोंडून पडलाय’ या कवितेच्या शीर्षकातून कवी वसंत आबाजी डहाके यांनी सार्थपणे प्रत्ययास आणली आहे.

शहरांमध्ये उंचचउंच टोलेजंग इमारतीचे तुरुंग उभारले गेले आहेत. त्यात बाल्यावस्था घुसमटते आहे. या उत्तुंग इमारतींच्या गजांआड समुद्र असाहाय्य होऊन अडकला आहे. समुद्राचे अस्तित्व हे विस्तीर्ण, अफाट व विशाल असते. ते सतत उचंबळलेले व जिवंत असते; परंतु भौतिक सुखाच्या हव्यासाने येणाऱ्या महानगरीय चंगळवादाने या विशाल जीवनाला कैद केले आहे. जणू संजीवन पाण्याची कबर बांधली आहे किंवा अमृताचे विषात रूपांतर झाले आहे. समुद्राची ही भावविवशता कवींनी ‘समुद्र कोंडून पडलाय’ या शीर्षकामधून प्रत्ययकारकरीत्या साकारली आहे. त्यामुळे हे शीर्षक या कवितेला अगदी सूचक व सार्थ आहे.

उपक्रम :

‘महानगरातील समस्या’ या विषयावर चर्चा करा.

तोंडी परीक्षा.

अ. शब्द ऐका. त्यांचा वाक्यात उपयोग करा.

  1. गगनचुंबी
  2. संत्रस्त
  3. वयस्क
  4. खिन्न
  5. हताश

आ. ‘वाढत्या शहरीकरणाचा जीवनावर होणारा परिणाम’, या विषयावर भाषण दया.

Leave a Comment